स्वस्थ ठाणे – सशक्त भारताचा संकल्प..!ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत उजाडले नवे पर्व सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्तसंकलन वाहिनी देणगी स्वरूपात झाली उपलब्ध
स्वस्थ ठाणे – सशक्त भारताचा संकल्प..!ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत उजाडले नवे पर्व सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्तसंकलन वाहिनी देणगी स्वरूपात झाली उपलब्ध
ठाणे, प्रतिनिधी:- ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत नवे पर्व उजाडले आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई, वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव (प.) आणि जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी एक कार्डियाक रुग्णवाहिका (MH-०४-MH-५३७५) आणि रक्तसंकलन वाहिनी (MH-०४-MH-५६१७) देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी व गरजू रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.ही रुग्णवाहिका व रक्तसंकलन वाहिनी दि.17 सप्टेंबर 2025 रोजी ‘सेवा पांढरावडा’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत ‘स्वस्थ नारी – सशक्त भारत’ या ध्येय वाक्याखाली यशवंतराव चव्हाण केंद्र येथे भव्य समारंभात हस्तांतरित करण्यात आली.
यासाठी जीआयसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिंद्र साळवी, जीआयसीच्या कंपनी सचिव सौ.नूतन सिंह, रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, गोरेगावचे अब्दुल बैग यांनी पुढाकार घेतला. या मान्यवरांच्या संयुक्त प्रयत्नांतून ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या इतिहासात एक सुवर्ण पान लिहिले गेले आहे.रुग्णवाहिका व रक्तसंकलन वाहिनीची किल्ली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार व दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सोपविण्यात आली. या सोहळ्यास केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांचे आभार मानले. ते म्हणाले की, ही साधने केवळ वाहने नाहीत, तर ठाणे जिल्ह्यातील अनेकांचे जीव वाचविण्याचे संकल्प आहेत. या विश्वासाने आम्हाला सक्षम केले असून मानवतेच्या या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीसमोर मी नतमस्तक आहे.
या देणगीमुळे ठाणे जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा आणखी बळकट होणार असून आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी नवसंजीवनी मिळणार आहे. रक्तसंकलन वाहिनीमुळे दुर्गम भागातील गरजू रुग्णांपर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा सहजतेने पोहोचणार आहे, तर कार्डियाक रुग्णवाहिका हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत देण्यात मोलाचे योगदान देणार आहे.
हा उपक्रम ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा आणि मानवतेच्या सेवेचा अजरामर ठसा उमटवणारा ठरेल, यात शंका नाही.