होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकीय प्रतिनिधी
‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ हा भगवान महावीर यांच्यासमोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या HND बोर्डिंगच्या निकालाने पूर्णत्वास गेला आहे. या सर्व प्रतिक्रियेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बोर्डिंगचा हा व्यवहार दोन्ही बाजूनं रद्द केल्यानं जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं, तेसुद्धा आपण शब्द दिलेल्या १ तारखेच्या आधीच !
आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांनी या प्रकरणी बोर्डिंगला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिसाद देत मी स्वतः बोर्डिंगला भेट देत भगवान महावीर आणि आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्याचवेळी समाज बांधवांशी संवाद साधताना माझी भूमिका स्पष्ट करत समाजाच्या मनात जे आहे, तसाच निर्णय घेतला जाईल, हा शब्द महाराजजींसमोर दिला होता. शिवाय महाराजजींनी १ नोव्हेंबर, २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर १ तारखेच्या आतच हा विषय संपवला जाईल, असं समाजाला सांगितलं होतं ! या पार्श्वभूमीवर मा. देवेंद्रजी आणि या संबंधित विविध घटकांशी हा व्यवहार रद्द व्हावा, यासाठी मी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याला आजच निकालाने यश आले.
‘मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत’, असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तिने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अशा प्रकारे जैन समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल समाजाचा मी सदैव ऋणी राहील !जय जिनेंद्र !!!