
भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन
राज्य प्रतिनिधी
केंद्र शासनाने २०२७ मध्ये जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जनगणना संचालनालयामार्फत प्रशिक्षण व पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या माहितीनुसार सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करावी. जनगणनेची कार्यवाही अचूक होण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. मुंबई येथील जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक प्रवीण भगत, जनगणना संचालनालयाचे अरुण साळगावकर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सायली ठाकूर, तहसीलदार वर्षा मनाळे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
समाजातील घटकांच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करताना जनगणनेचा अहवाल उपयुक्त ठरतो. या माहितीच्या आधारे विविध योजना राबविल्या जातात आणि विकासाची दिशा निश्चित केली जाते. त्यामुळे आगामी जनगणना अचूक होण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले. ही जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत असून त्यादृष्टीने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाला सर्वांची उपस्थिती बंधनकारक आहे. प्रशिक्षणात देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी. जनगणनेतून एकही घर सुटणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी सर्व तहसीलदार, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच जनगणनेसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. घरयादी तयार करणे, गटांची रचना करणे याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
*****



