
नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थविरोधी ठाणे; जिल्हा प्रशासनाने केला संकल्पअंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्याचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा निर्धार
ठाणे, प्रतिनिधी: “मी अंमली पदार्थांचा कधीही वापर करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेन.” स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय युवा दिनाचे’ औचित्य साधत ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थविरोधी शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरणा देण्याची प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस उपअधीक्षक (गृह), ठाणे ग्रामीण येथील श्रीमती निलम वाव्हळ, तसेच महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे संघटक श्री. मिलिंद पाटील उपस्थित होते.
या अभियानाचा मुख्य हेतू युवक-युवतींमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना निरोगी व सकारात्मक जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे आणि अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाची सुटका करणे हा आहे. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता कुटुंब, समाज व राष्ट्राच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
अंमली पदार्थमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी सुजाण निर्णय घेणे आणि जीवनातील आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जाणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. युवकांच्या सक्रिय सहभागामुळे या अभियानाला मोठे यश मिळाले आहे.
शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका तसेच विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवून अभियानाला व्यापक स्वरूप दिले. या यशस्वी उपक्रमातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी समाधान व्यक्त केले.
*****



