
जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जालना, प्रतिनिधी:- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अतिरिक्त इंधन साठा करण्याची कोणतीही गरज नसून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000



