
मुंबईची लेक झाली अंबरनाथची ‘आधुनिक कृषिगाथा’ –दर्शना दामले
ठाणे प्रतिनिधी-
इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे मुंबईच्या ग्लॅमरस वातावरणातून येऊन थेट शेतीमातीत आपले नंदनवन फुलवणाऱ्या श्रीमती दर्शना आनंद दामले यांची यशोगाथा आज अनेक महिलांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. महिला सक्षमीकरण आणि एकात्मिक शेती पद्धतीचा यशस्वी मेळ घालत त्यांनी केवळ स्वतःची प्रगती साधली नाही, तर समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.सुरुवात सामाजिक जाणीवेतून
मूळच्या मुंबईच्या असलेल्या दर्शनाताई लग्नानंतर बदलापूर येथे स्थायिक झाल्या. माहेरी शेतीची पार्श्वभूमी नसतानाही केवळ झाडांविषयीच्या प्रेमापोटी त्यांनी शेतीकडे पाऊल वळवले. मात्र, त्यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक फायद्यासाठी नव्हता. समाजासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीतून त्यांनी महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि ‘गायत्री कुटुंब समुपदेशन केंद्रा’च्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘जाणीव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे
युरोप दौऱ्याने बदलली दृष्टी, 2009 मध्ये कृषी विभागामार्फत त्यांची निवड युरोपमधील जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि स्पेन अशा देशांच्या अभ्यास दौऱ्यासाठी झाली. या दौऱ्यात त्यांनी वाइनरी टेक्नॉलॉजी, सौर ऊर्जा आणि बायोगॅस यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. या अनुभवातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या जांभूळघर (ता. अंबरनाथ) येथील शेतात आमूलाग्र बदल घडवले. एकात्मिक आणि शाश्वत शेतीचा मंत्र आज दर्शनाताईंकडे जांभूळघर येथे सुमारे दोन हेक्टर जमीन असून त्यांनी ‘एकात्मिक मिश्र शेती पद्धती’चा अवलंब केला आहे. त्यांच्या शेतीची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: सौर ऊर्जेचा वापर: विहिरीच्या पंपापासून ते शेतीतील सर्व कामांसाठी त्यांनी विद्युत ऊर्जेचा वापर पूर्णपणे थांबवून ती सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालवली आहे. मुक्त संचार गोठा : त्यांच्याकडे 10 गाई आणि 5 ते 6 म्हशी असून, त्यांनी ‘मुक्त गोठा पद्धत’ अवलंबली आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध ‘पुगनूर’ जातीच्या बुटक्या गायीचाही समावेश आहे.
विविध फळबाग लागवड : त्यांच्या शेतात आंबा (0.90 हे.), भाजीपाला (0.20 हे.), नारळ, काजू, पेरू, चिकू आणि पपई यांसारख्या विविध पिकांची लागवड आहे. सेंद्रिय शेतीवर भर : रासायनिक खतांना फाटा देत त्या स्वतः गांडूळ खत निर्मिती करतात आणि फवारणीसाठी गोमूत्राचा वापर करतात.
विस्तार आणि मार्गदर्शन, ठाणे जिल्ह्यासोबतच त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातही चार एकर शेती घेतली असून तिथेही कृषी विभागाच्या सहकार्याने नारळ, आंबा आणि काजूची यशस्वी लागवड केली आहे. या प्रवासात त्यांना कृषी पर्यवेक्षक श्री. संदीप जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. “शेती ही केवळ उपजीविका नसून तो जगण्याचा आनंद आहे,” असे दर्शनाताई मानतात. त्यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी भात पिकवण्यापासून सुरू केलेला हा प्रवास आज एका मोठ्या कृषी व्यवसायात रूपांतरित झाला आहे. शासनाच्या ‘यशस्विनी’ अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत त्या आता ‘PMFME’ योजनेद्वारे इतर महिलांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत. दर्शना आनंद दामले यांची ही यशोगाथा सिद्ध करते की, आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या जोरावर महिला शेती क्षेत्रात क्रांती घडवू शकतात.
0000000000



