जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन*1 मे पासून डिजिटल जनगणनेला सुरुवात..
अमरावती, प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये 1 मेपासून स्व-जनगणनेच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमाद्वारे होणार असून, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची म्हणजेच ‘स्व-गणना’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
यावेळच्या जनगणनेमध्ये दि. 1 ते 15 मे कालावधीत नागरिक स्वतःची नोंदणी करू शकतील. नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. यात साधारणपणे 30 प्रश्न विचारले जातील, ज्यांची उत्तरे देऊन नागरिक स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. ही माहिती भरल्यानंतर एक ‘SE-ID’ (Self-Enumeration ID) जनरेट होईल, जो नागरिकांना जपून ठेवावा लागेल. हा आयडी प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी आलेल्या प्रगणकाला द्यावा लागणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्व-गणना केली आहे. या प्रक्रियेसाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ लागला आहे. नागरिकांनाही वेळ काढून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दि. 15 मेनंतर, म्हणजेच दि. 16 मेपासून प्रशासनातर्फे नियुक्त केलेले प्रगणक घरोघरी येऊन नागरिकांनी भरलेल्या माहितीची पडताळणी करणार आहेत. डिजिटल जनगणनेच्या या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे.