सांगली, प्रतिनिधी: भारतीय डाक खात्यामार्फत ‘ज्ञान पोस्ट’ ही योजना दि. 1 मे 2025 पासून सुरू केली असून ही योजना सांगली विभागातील सर्व कार्यालयामध्ये सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक बसवराज एम. वालीकार यांनी केले आहे.
आजच्या डिजीटल युगात सुध्दा शिक्षणासाठी पुस्तकांचे अनन्य साधारण महत्व टिकून आहे. देशातील कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा नागरिकांना पुस्तकाअभावी त्याच्या शिक्षणामध्ये बाधा येऊ नये म्हणून भारतीय डाक विभागाने ज्ञान आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने दि. 1 मे 2025 पासून ‘ज्ञान पोस्ट’ ही नवीन टपाल योजना खास पुस्तके पाठविण्यासाठी सुरू केली आहे. यामध्ये मान्यताप्राप्त शिक्षणमंडळे, शासनाची विद्यापीठे, सरकार अंतर्गत स्वायत्त संस्था आणि वैधानिक संस्था ही नियमित अभ्यासक्रमाची पुस्तके, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य पुस्तके, विविध स्पर्धा परीक्षासाठी वापरली जाणारी पुस्तके पूर्ण भारतभर पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
दरपत्रक (जीएसटी वगळून) – 300 ग्राम पर्यंत 20 रूपये, 301 ग्राम ते 500 ग्राम 25 रूपये, 501 ग्राम ते 1000 ग्राम 35 रूपये, 1001 ग्राम ते 2000 ग्राम 50 रूपये, 2001 ग्राम ते 3000 ग्राम 65 रूपये, 3001 ग्राम ते 4000 ग्राम 80 रूपये व 4001 ग्राम 5000 ग्राम 100 रूपये.