राज्यात सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना एक वर्षासाठी लागू रायगड जिल्ह्यात ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ची नियुक्ती..
रायगड, प्रतिनिधी-राज्य शासनाने खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या कालावधीसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक वर्षासाठी रायगड जिल्ह्यासाठी ‘भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. अधिसूचित पिके पेरणाऱ्या खातेदारांसह, कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात.
यावर्षीपासून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, ई-पिक पाहणी (Digital Crop Survey App) द्वारे पिकांची नोंदणी व शेतकरी ओळख क्रमांक (AgriStack Farmer ID) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-पिक पाहणी व विमा यामध्ये तफावत आढळल्यास विमा रद्द होणार असून हप्ता रक्कमही जप्त होणार आहे.
विमा हप्त्याची माहिती:भात पिकासाठी: ₹४५७.५० प्रती हेक्टर,नाचणी पिकासाठी: ₹१०० प्रती हेक्टर(टीप: यंदा एक रुपयात विमा हप्ता योजना लागू नाही.)आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज,आधार कार्ड,स्वयंघोषणापत्र (पेरणी केलेल्या पिकाचे),भाडेपट्टा करारनामा (आवश्यक असल्यास), संमतीपत्र,बँक पासबुकची प्रत,ई-पिक पाहणी आणि शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असेल.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत विमा काढून संभाव्य नुकसानीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.#पीकविमा