राज्य प्रतिनिधी-देशभरात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत प्रचंड पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, नद्यांना पूर येणे, रस्ते वाहतूक ठप्प होणे आणि दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नद्यांच्या आणि ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनानेही मदत–साहाय्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे
मुसळधार पावसाचा शेतीवर आणखी परिणाम होऊ शकतो. आधीच उभ्या पिकांवर पावसामुळे पाणी साचल्याने हानी झाली असून येत्या दिवसांत शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढण्याची शक्यता आहे.सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हवामान खात्याने दिलेला हा इशारा गांभीर्याने घ्यावा आणि नागरिकांनी अनावश्यक धोकादायक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पाऊस होऊ शकतो तर 11 ते 12 सप्टेंबरला ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस होईल. दरम्यान इतक्या मोठ्या पूरानंतरही पंजाबमध्ये पावसाचा धोका हा कायम आहे. सुमारे 4 लाख लोक पुराच्या संकटाचा सामना करत आहेत. या पावसामुळे अनेक हेक्टर पिकांचे नुकसान देखील झाले. उत्तराखंडमध्ये आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. डेहराडून, हरिद्वार, जोशीमठ, लॅन्सडाउन, मसूरी शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेच नाही तर लोकानी नद्यांपासून दूर राहण्याचे आदेशही प्रशासनाने दिली आहेत.