हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे
मुंबई प्रतिनिधी-
‘हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात देश विदेशातून १८ ते २० लाख भाविक येणे अपेक्षित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियोजन करण्यात आले असून, मुख्य मंडपात एकावेळी ८० हजार ते १ लाख भाविक आसनस्थ होतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र पार्किंग स्थळे ३८, विशेष तीन हेलिपॅडची व्यवस्था, २५ हजार भाविकांची निवास व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे १ हजार पेक्षा अधिक, स्वच्छता कर्मचारी ५०० पेक्षा अधिक उपलब्ध असणार आहेत.
नवी मुंबई येथे होणाऱ्या हिंद -दी- चादर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरद रावजी ढोले, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपालसिंग सिद्धू, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हॅपी सिंग उपस्थित होते.