उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा
जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा रविवार दि.23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत त्यांच्या गावच्या शाळेतील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी केले आहे.
उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत परीक्षा ही ऑफलाईन पध्दतीने होणार असून प्रश्नपत्रिका 150 गुणांची असणार आहे. यात वाचन 50 गुण, शब्दलेखन 50 गुण आणि संख्यात्मक ज्ञानासाठी 50 गुण अशी गुणांची विभागणी करण्यात आली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 51 गुण आवश्यक आहेत. उमेदवारांना परीक्षेसाठी निळा व काळा शाईचा पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात परीक्षेसाठी एकुण 970 परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत. परीक्षेत दिव्यांग उमेदवारांना 60 मिनिटांचा वेळ अधिकचा देण्यात येणार आहे. असे शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-