छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता मत्स्यव्यवसाय विभागामार्फत केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा या योजनेअंतर्गत ॲक्वाकल्चर व मत्स्यव्यसाय वृद्धींगत करण्याकरीता ‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ ही सहयोजना सन 2024-25 ते 2028-29 या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे.
योजना राबविण्याकरीता महाराष्ट्र राज्यातील 32 जिल्ह्यांतील 192 तालुक्यांमधील 4917 गावंचा समावेश असून यामध्ये जिल्ह्यतील 4 तालुके (कन्नड, सोयगाव, सिल्लोड व खुलताबाद) व 11 गावंचा समावेश आहे.
योजनेद्वारे आदिवासी क्षेत्र व समुदायांचा विस्तृत विकास करण्याकरीता मूळ पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजीरोटी या समस्यांचे निराकरण करण्याकरीता उपलब्ध संसधानांमधील दुरावा व अंतर दुर करणे इ. साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
दि.15 जून 30 जून या कालावधीत ‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ विशेष अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये गाव पातळीवरील, क्लस्टर पातळीवरील शिबिरे आयोजित करुन शासनाच्या विविध सेवा प्रत्यक्षात पुरविण्याचे नियोजन आहे. योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील ग्रामस्तरीय यंत्रणा तसेच सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय छत्रपती संभाजीनगर कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुग्धव्यवसाय विकास विभाग, पहिला माळा, दुध डेअरी सिग्नल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – पिन 431 001 ई-मेल acfchhatrapatisambhajinagar145@gmail.com असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ.मधुरिमा जाधव यांनी केले आहे.