नवी मुंबईत करावेच्या ज्ञानदीप शाळेत चिमुकल्या बाल हातांनी घडविल्या पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती
नवी मुंबई प्रतिनिधी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक – प्लास्टिकमुक्त साजरा करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने नागरिकांना यापूर्वीच आवाहन करण्यात आले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या अनुषंगाने शालेय स्तरावरूनही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी श्रीगणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या गणेशोत्सवाच्या आकर्षणाला पर्यावरणाची जोड देत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती बनविणेची कार्यशाळा करावे गावातील ज्ञानदीप प्राथमिक शाळेत उत्साहात पार पडली.
यामध्ये शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून सुंदर, सुबक आणि आकर्षण गणेश मूर्ती तयार केल्या. अशा प्रकारची कलात्मक कार्यशाळा आयोजित केलेली असल्याने सकाळपासूनच संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण होते. या गणेशमूर्ती कार्यशाळेत शाळेत 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला. आपल्या स्वत:च्या हातांनी गणपतीच्या सुबक मूर्ती बनविण्याचा आनंद शाळेतील बालमूर्तीकारांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. या छोट्या कलाकारांनी लहानग्या हातांनी शाळेतील चित्रकला शिक्षिका श्रीम.प्राजक्ता गर्जे व श्रीम.रेश्मा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या. कार्यशाळेचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री.बंकट दिनकर तांडेल यांनी केले होते. या कार्यशाळेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे व विशेषत्वाने महाआणि पालिकेचे स्वच्छता अधिकारी श्री. विजय नाईक यांचे सहकार्य लाभले.