सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आगामी सार्वजनिक गणेश उत्सव धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसाद उत्पादन व वितरण करताना स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाये सहआयुक्त द.वि. पाटील यांनी केले आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजक मंडळे, स्वयंसेवक व नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रसाद उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, अन्नपदार्थ चांगल्या प्रतीचे व सुरक्षित असावेत. उत्पादनाची जागा स्वच्छ, आरोग्यदायी व प्रदुषणमुक्त ठेवावी.कच्चे अन्न पदार्थ खरेदी करतेवळी ते चांगले व लेबलयुक्त असल्याची खात्री करावी व खरेदी बील घेण्यात यावे. प्रसाद तयार करणारे व्यक्ती स्वच्छ व आरोग्यदायी स्थितीत असावेत, तसेच हात धुवून प्रसाद तयार करावा व सर्व स्वच्छतेचे नियम पाळावेत. प्रसाद बनवताना स्वच्छ भांडी, स्वच्छ पिण्यायोग्य पाणी आणि योग्य पॅकिंग साहित्य वापरावे. उघडयावर किंवा अस्वच्छ ठिकाणी प्रसाद तयार करु नये व साठवू नये.मिठाई तयार करतांना लागणारा खवा, मावा इ. अन्न परवानाधारक व्यक्तीकडून ताज्या स्वरुपात खरेदी करावा, सुरक्षित पद्धतीचा अवलंब करावा. दूषित किंवा बुरशी लागलेले पदार्थ वापरु नयेत.प्रसाद वितरण करताना लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोतनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
गणेश मंडळांकडून भंडारा किंवा प्रसाद वितरण केले जाते. त्यांनी संबंधित नियमांचे पालन करण्यासाठी FOSCOS वेबसाइटवरऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन आयोजक, स्वयंसेवक व नागरिकांनी करणे अत्यावश्यक असल्याचे विभागाने कळविले आहे