राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…
राज्य प्रतिनिधी -राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव व मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते ठामपणे आंदोलन करत आहेत. सरकारने जरांगे पाटील यांच्या समाधानासाठी काय करावे, हा प्रश्न समोर आला आहे.
ओबीसी संघटनांनीही या आंदोलनास उत्तर देत उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आरक्षण देण्यास विरोध झाल्यास आणखी मराठा समाज मुंबईकडे येणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलकांची संख्या वाढू शकते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वाढू शकतो. त्यामुळेच राज्य सरकारने मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
या आदेशानुसार सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुंबईत पोलीस उपस्थिती वाढवावी लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता मुंबई पोलिसांनी तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.