मुंबईत ओला आणि उबर आधारित टॅक्सीसेवा आता अधिक महाग होणार..
राज्य प्रतिनिधी -मुंबईत ओला व उबरसारख्या आधारित टॅक्सीसेवा आता अधिक महाग होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या भाडेनियमांनुसार, दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून प्रत्येक किलोमीटरसाठीचे भाडे बावीस रुपये बहात्तर पैसे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना दैनंदिन प्रवासासाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषतः रोजंदारीने कामाला जाणाऱ्या प्रवाशांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून त्यांच्या खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, प्रवासाची मागणी जास्त असलेल्या वेळेस म्हणजे सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, सध्याच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडेवाढ करण्यास कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. उलट, मागणी कमी असलेल्या वेळेस, रात्री च्या वेळी भाड्यात पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात करण्याची मुभा असेल. त्यामुळे प्रवाशांना एका दिवसातच वेगवेगळ्या वेळेस बदलणारे दर अनुभवावे लागतील. हे भाडेनियम सर्ज प्रायसिंग पद्धतीवर आधारित असून, कंपन्यांना मागणीअनुसार दर ठरवण्याची लवचिकता मिळाली आहे.या बदलामुळे कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसणार आहे. आधीच वाढलेले इंधनदर आणि वाहतूकखर्च यामुळे प्रवास महाग झालेला असताना आता अॅप-आधारित टॅक्सीभाड्यातील ही वाढ लोकांच्या आर्थिक नियोजनावर ताण आणणारी ठरेल. सरकारने केलेल्या या नव्या धोरणाचा उद्देश सेवा स्थिर ठेवणे आणि वाहनचालकांना योग्य परतावा मिळवून देणे असा असला तरी, साधारण नागरिकांसाठी ही आणखी एक महागाईची झळ ठरणार आहे.