
‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे
बुलढाणा, प्रतिनिधी): देशभरात दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. हा अभियान उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि व्यापक लोकसहभागातून यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करून सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागप्रमुखांच्या जिल्हास्तरीय बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नगर विकास विभाग जिल्हा सह आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक, सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख ऑनलाइनद्वारे उपस्थित होते.
बैठकीत अभियानाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित असून, त्यानिमित्त जिल्हाभर सामूहिक वंदे मातरम् गायन, प्रभात फेऱ्या, बाईक रॅली, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विविध स्तरांवर प्रभावी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान, त्याचा योग्य वापर आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची प्रभावी आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याने काम करावे, असे निर्देश दिले.तसेच अभियानाच्या कालावधीत भारताच्या ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000



