
जिल्ह्यात ‘पोकरा’ अंतर्गत कृषी अवजार बँकेसाठी आर्थिक सहाय्य; 5 एप्रिलपर्यंत अर्जाचे आवाहन
अमरावती, प्रतिनिधी: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्प्यांतर्गत अमरावती जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना कृषी व्यवसायात भरारी घेण्याची अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या योजनेतून गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्यांच्या 60 टक्क्यांपर्यंत म्हणजेच कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रकल्प गावातील उमेद आणि माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच गाव संघ पात्र राहतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे, ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला आहे, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. जर एकाच गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर लाभार्थींची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाईल. प्रकल्पाचे मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, राष्ट्रीयकृत बँकेकडून 75 टक्के कर्ज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर आणि फवारणी पंप यांसारखी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करता येईल. इच्छुक संस्थांनी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टलवर (https://dbt-ndksp.mahapocra.gov.in/) 5 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000000



