
मुंबई : बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ पार पडला. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षण अधिकारी माधुरी भोसले, सदस्य नीलिमा चव्हाण, जयश्री पालवे, सायली पालखेडकर, संजय सिंगल, चैतन्य पुरंदरे, आदिसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.



