
पीकस्पर्धेत सहभाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
सांगली, द प्रतिनिधी : कृषि विभागामार्फत राज्यस्तरावरून अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२५-२६ जाहीर करण्यात आल्या आहेत. या पीकस्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे
कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप (११) व रब्बी (०५) हंगामातील एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून, तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.
पीकस्पर्धेतील खरीप पीके : भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल. रब्बी पीके – ज्वारी, गहु, हरभरा, करडई, जवस (एकूण ०५ पिके). पीक स्पर्धेत खरीप हंगामात मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल पीकासाठी 31 ऑगस्ट 2025 तर रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या पीकासाठी 31 डिसेंबर 2025 अशी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्पर्धा पातळीवर अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकासाठीचे बक्षीस पुढीलप्रमाणे – तालुका पातळी – 5 हजार, 3 हजार व 2 हजार रूपये. जिल्हा पातळी – 10 हजार, 7 हजार व 5 हजार रूपये. राज्य पातळी – 50 हजार, 40 हजार व 30 हजार रूपये.
00000



