नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा थकित निधी शेतक-याच्या खात्यावर जमा करून नमो शेतकरी महासन्मान योजना पूर्ववत चालू करा… बाबासाहेब कोलते
जालना (प्रतिनिधी) – राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकित निधी गेल्या एक वर्षापासून शेतक-याला मिळाला नसून तो तात्काळ शेतक-याच्या खात्यावर जमा करून नमो शेतकरी महासन्मान योजना पूर्ववत चालू ठेवण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्रातील व भारत देशातील सर्व शेतक-यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना ही अल्पभूधारक शेतक-यांसाठी सुरू केली असून देशातील प्रत्येक शेतक-याला एका वर्षाला 6000/- रुपये म्हजणे प्रत्येकी चार महिन्याला रुपये 2000/- चा हप्ता केंद्र शासनाकडून दिला जातो. केंद्र शासनाच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तत्कालीन भाजपा-शिवसेना महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सुरू केली होती. परंतु राज्य सरकारची ही नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा फक्त एक वर्षासाठीच त्याचा शेतकरी बांधवांना लाभ मिळाला असून गेल्या एक वर्षापासून राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा निधी प्रत्येकी चार महिन्याला रुपये 2000/- म्हणजे वार्षिक रुपये 6000/- मिळालेला नाही.
केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकित निधी तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर जमा करावा व केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकाने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजना पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.