मुंबई प्रतिनिधी-मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी अन्न घालणाऱ्यांविरोधात कारवाईस प्रारंभ झाला असून, माहीम येथील कबूतरखान्यावर एका व्यक्तीने नियम झुगारून कबुतरांना अन्न दिल्याने त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
ही कारवाई भारतीय न्याय संहितेतील कलम दोनशेतेवी, दोनशेपन्नास आणि दोनशेअठ्ठावन्न अंतर्गत करण्यात आली आहे. या कलमांतर्गत, अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणारी कृती, व समाजात रोग पसरवण्याची शक्यता असलेली निष्काळजी वर्तन अशा प्रकारांना शिक्षा होऊ शकते
.मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट आदेश दिले होते की, शहरात कबुतरखान्यांमधून रोगजन्य संसर्ग पसरत असून ते सार्वजनिक आरोग्यास घातक ठरत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी कबुतरांना अन्न देणे थांबवले जावे व उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश महापालिका व पोलिस प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार महापालिकेने शहरातील विविध कबुतरखान्यांवर फलक लावून अन्न घालण्यास बंदी घातली होती. तसेच नियम मोडणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्याची कार्यवाहीही सुरू केली होती. मात्र, काही नागरिकांकडून या आदेशाला तिलांजली देण्यात येत होती.
या पहिल्या गुन्ह्यानंतर पोलिस आणि महापालिका प्रशासन दोघेही सतर्क झाले असून, आता नियम मोडणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या निर्णयाचे पालन करावे व कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी अन्न घालणे टाळावे.