ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू
ठाणे, प्रतिनिधी: आगामी बकरी ईद सण, विविध राजकीय पक्षांची आंदोलने आणि नेत्यांचे दौरे यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक 15 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून ते 30 मे 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात लागू राहतील.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या विविध राजकीय संघटनांकडून मोर्चे, रॅली आणि आंदोलने केली जात आहेत. तसेच, दिनांक 27 मे 2026 रोजी बकरी ईदचा सण साजरा होणार असून, जिल्ह्यातील सुमारे 94 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय नमाज पठणासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, या उद्देशाने प्रशासनाकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पुढील कृत्यांवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. शस्त्र बाळगणे: तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरी, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास सक्त मनाई आहे. स्फोटक पदार्थ: कोणताही क्षारक (Acid) किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेणे प्रतिबंधित आहे. दगड व क्षेपणास्त्रे: दगड किंवा इतर फेकून मारता येतील अशी साधने जमा करणे अथवा त्यांचा प्रचार करणे. प्रक्षोभक प्रदर्शन: व्यक्तीचे प्रेत, आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. घोषणाबाजी व भाषणे: सार्वजनिक ठिकाणी सभ्यता व नीतिमत्तेस बाधा येईल अशी भाषणे करणे, प्रक्षोभक गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे अथवा अशा प्रकारचे फलक व चिन्हे प्रदर्शित करणे. जमावबंदी: सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.