vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा —जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा; आपत्ती टाळण्यासाठी सज्ज राहा —जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, प्रतिनिधी— जिल्ह्यात संभाव्य पावसाळी आपत्ती टाळण्यासाठी सर्व विभागांनी #मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, अपर पोलिस अधिक्षक सूरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी उष्णतेमुळे अचानक मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे
विष्णुपूरी धरणात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा असून त्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच धरणाचे गेट, नवीन पाईपलाईन कामे यांची स्थिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले. मागील वर्षी मुखेड, नायगाव, बिलोली, कंधार यासह विविध तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील नाल्यांची स्वच्छता करून सखल भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच पूल आणि रस्त्यांवरून पाणी वाहून जाऊन नागरिक अडकणार नाहीत यासाठी नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.आरोग्य विभागाला ग्रामीण भागात औषधसाठा मुबलक ठेवण्याचे, तसेच सर्पदंशावरील औषधे सर्व आरोग्य केंद्रात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागाने नदीपात्रात पशुधन बांधू नये यासाठी जनजागृती करावी, असेही सांगण्यात आले.
बैठकीच्या शेवटी, सर्व विभागांनी तालुका पातळीवरील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले व सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बुलढाण यांची- त्रैमासिक आढावा सभा सपंन्न

vishwatmaklokswamivarta

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार जाहीर

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी; फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग, दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

vishwatmaklokswamivarta