पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी
सातारा प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. चालू वर्ष २०२५-२६ साठीची ही ई-केवायसी मोहीम पूर्ण करण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही अशांनी त्वरीत ई-केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे
लाभार्थी शेतकऱ्यांना बायोमॅट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी प्रमाणीकरण पूर्ण करता येईल. बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी नजीकच्या सामायिक सुविधा केंद्र (CSC Center) वर जाऊ शकतील, तसेच शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर ‘पीएम-किसान’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याव्दारे ई-केवायसी पूर्ण करू शकतील.
वृद्ध, आजारी किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना हालचाली संबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी अशा शेतकऱ्यांकडे वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करतील. जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती. फरांदे यांनी केले आहे.