
*कॉफी विथ कलेक्टर उपक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद**अपयशाने खचू नका, नव्या दमाने उभे राहा; तरुण पिढी देशाचे भविष्य: जिल्हाधिकारी संतोष पाटील*
सातारा, प्रतिनिधी आजचे विद्यार्थी अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी आहेत. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे त्यांनी आतापासूनच निश्चित केले आहे. पालकांनी त्यांच्या या स्वप्नांना पाठिंबा द्यावा आणि शिक्षकांनीही त्यांच्या तयारीसाठी आतापासूनच मार्गदर्शन करावे. लक्षात ठेवा, यश किंवा अपयश हे अंतिम नसते. जर तुम्ही अपयशी ठरलात, तर त्याचा अर्थ आयुष्य संपले असा होत नाही. अपयशातून शिका आणि नव्या दमाने पुन्हा उभे राहा. आजची तरुण पिढी हे देशाचे भविष्य असून तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे, तिचा योग्य वापर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी श्री. पाटील बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी थेट आणि मोकळेपणाने संवाद साधला.



