सुनिर्मल फाऊंडेशनकडून धारावीतील १०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
मुंबई | प्रतिनिधी-शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे या उद्देशाने रविवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२६रोजी सायंकाळी गणेश विद्यालय, धारावी येथे सुनिर्मल फाऊंडेशन, धारावी यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते तथा संत कक्कय्या विकास संस्थेचे सचिव राजेश खंदारे, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्रा. जे. आर. केळुसकर, ॲड. सुनील शिर्के, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रेवती आळवे, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा तेंडुलकर, संपादक दिलीप शेडगे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते गिरीराज शेरखाने, शब्दश्री विलास देवळेकर आणि सुनिर्मल फाऊंडेशनचे कार्यप्रमुख दत्ता खंदारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शब्दश्री विलास देवळेकर यांनी त्यांच्या “म्युझिकल इको” साऊंड सिस्टीमधून सादर केलेल्या “विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप” आणि जागतिक मैत्री दिनानिमित्त “मैत्री दिनाची कविता” या गीतांनी झाली. त्याला उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. प्रा. जे. आर. केळुसकर म्हणाले की, शिक्षण हेच जीवनातील सर्वात मोठे शस्त्र आहे. शालेय साहित्याबरोबरच चिकाटी आणि स्वाध्यायाची जोड दिली तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्याचे आवाहन करत मोबाईलपेक्षा पुस्तकांशी मैत्री करा, कारण पुस्तके तुम्हाला मोठे स्वप्न दाखवतील असे सांगितले. ॲड. सुनील शिर्के यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे भान ठेवून जबाबदार नागरिक बनण्याचा संदेश दिला. तर राजेश खंदारे यांनी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.
सुनिर्मल फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करीत आहे. यावर्षीही फाऊंडेशनने १०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, कंपास बॉक्स आदी साहित्याचे वाटप केले. सुनिर्मल फाऊंडेशनने असेच सामाजिक कार्य सुरू ठेवावे, अशी अपेक्षा उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी सुनिर्मल फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य तसेच साप्ताहिक ‘भगवे वादळ’चे संपादक दत्ता खंदारे यांचा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावेश खंदारे, मंगेश गायकवाड, परशुराम गजाकोष, पूर्वा खंदारे, राम म्हस्के, मनोहर कदम, विशाल नारायणे तसेच धारावी पोलीस पंचायत बिट क्र.२चे सर्व सभासद उपस्थित होते.—