नशा नाही, नवचैतन्याची दिशा घेऊया!” — जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या DAWN उपक्रमांतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती*
रायगड प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या वतीने जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ, चोंढी किहीम येथे अंमली पदार्थांचे सेवन व अवैध तस्करीविरोधात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत व सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमामध्ये ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
जिल्हा रुग्णालय रायगड येथील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट श्रीमती प्रफुल्ला कांबळे यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे मानसिक, सामाजिक व शारीरिक दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे फक्त वैयक्तिक विनाश नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर अंधार पसरवणारा धोका आहे.यावेळी अॅड. तनुष्का पेडणेकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच “१५१००” हा हेल्पलाइन क्रमांक नागरिकांनी नोंदवून ठेवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात तेजस्विनी निराळे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “सजग व्हा, जागरूक रहा; नशामुक्त समाज घडवूया!” आणि सुरक्षित भारत घडवण्याच्या दिशेने प्रत्येकाने योगदान द्यावे.
DAWN (Drug Abuse Warning Network) उपक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड गावागावांत जाऊन विविध शिबिरांद्वारे अंमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती करत आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील तरुणाईला योग्य दिशा मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.